कुणीतरी विचारलाच प्रश्न
तो प्रश्न होता की
घालमेल होती कुणाच्या अस्वस्थ मनाची
हे सांगणे अवघडच
पण एक मात्र खरे की
त्या निनादाने पायाखालची जमीन विदीर्ण व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नव्हता
तसं पहिल्यांदाच नव्हतं घडत आयुष्यात असं काही
या आधी पण उतरायचेच काही क्षण
घड्याळीच्या पंखांवरून
आपल्या वर्तुळाकार आयुष्याची आठवण करून देण्यासाठी
मग असाच निघून जायचा वेळ
हृदयागारातील आरश्यामध्ये तासनतास डोकावून पाहताना
माथ्यावर चढलेले ढग
एकमेकांची खुन्नस काढण्यासाठी
प्रचंड धावाधाव करत आहेत आज
कोण काय शोधतोय कुणाचे कुणालाच ठाव नाही
मनातला पाझर
की पापण्यांतील पाणी
पहाटेचे गीत
की विरहाची गाणी
हा ज्याचा त्याचा प्रश्न
आज होऊ देत आतबाहेर कालवाकालव कितीही
होऊ देत आठवणींचा उल्कापात
निर्जीव दगडांच्या कानशीलांवर
मी मात्र खचनार नाही
वादळाच्या रथात बसून
जाणिवांच्या चक्रव्यूहात घुसायचय मला
अन शोध घ्यायचाय अभिमन्यूच्या अपयशाचा
खचलेला आत्मविश्वास
की तालमेचा आभाव
अत्युच्च प्रेम
की वायफळ अहंभाव
सारेच प्रश्न अनुत्तरित
निरज पुरुषोत्तम चौधरी
वर्ष- 2015
No comments:
Post a Comment